खेड ; रसायनमिश्रित पाणी प्यायल्याने 3 म्हशींचा मृत्यू, 6 म्हशी अत्यावस्थ

0
133
बातम्या शेअर करा

खेड – मुंबई -गोवा महामार्गावरील लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यातून नाल्यात सोडण्यात आलेले रसायनमिश्रित पाणी प्यायल्याने तीन दुभत्या म्हशींचा मृत्यू झाला, तर तर सहा म्हशी अत्यावस्थ झाल्या. हा प्रकार सोमवार (दि. ७ जून) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार लोटे औद्योगिक वसाहत परिसरातील आवाशी फाट्याजवळ असलेल्या कुरणात यशवंत आखाडे यांच्या मालकीच्या ९ म्हशी (काही गाभण तर काही दुभत्या) चरण्यासाठी सोडण्यात आल्या होत्या. कुरणाशेजारी असलेल्या नाल्यात कोणत्या तरी रासायनिक कारखान्यातून पाणी सोडण्यात आल्याने हे पाणी रसायनमिश्रित झाले होते. ते पाणी म्हशींनी प्यायल्याने त्या अत्यावस्थ झाल्या. कुरणात चरणाऱ्या म्हशी अचानक जमिनीवर आडव्या होऊन तडफडू लागल्याने आखाडे घाबरून गेले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे नागरिक जमा झाले. कुरणात चरणाऱ्या म्हशींना अचानक काय झाले, हा प्रश्न साऱ्यांनाच पडला.

दरम्यान काही जणांनी नाल्यातील पाण्याची पाहणी केली असता नाल्यातील पाणी रसायनमिश्रित आढळून आले आणि नेमके काय झाले असेल, याचा उलगडा झाला. खेड पंचायत समितीचे उपसभापती जीवन आंब्रे यांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पशुवैद्यकीय पथकाला माहिती देताच ते पथकही आले. अत्यवस्थ झालेल्या म्हशींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. अशा प्रकारे नाल्यात विषारी पाणी सोडणे पाळीव जनावरांच्या जिवावर बेतणारे असल्याने संबंधित कारखान्याची चौकशी करून व्यवस्थापनावर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here