गुहागर आगारात एसटीला चार तास ‘ब्रेक’; कर्मचाऱ्यांचा अघोषित संप! तर सभापती ,उपसभापती यांची यशस्वी शिष्टाई

0
104
बातम्या शेअर करा

गुहागर – यश घोणसेपाटील
गुहागर आगारातील एसटी वाहतूक गुरुवारी तब्बल चार तास ठप्प राहिल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. एसटी बसेसना अधिकृत थांबा नसलेल्या हॉटेल्स व ढाब्यांवर थांबविल्याबद्दल चालक-वाहकांवर कारवाई करण्याचे लेखी आदेश निघाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. या कारवाईच्या निषेधार्थ बहुतांश चालक-वाहकांनी ज्यादा ड्युटी करण्यास नकार देत प्रशासनाला सहकार्य न करण्याची भूमिका घेतली. परिणामी चालक-वाहकांच्या कमतरतेमुळे सकाळी 10 वाजल्यानंतर गुहागर आगारातून एकही एसटी बस मार्गस्थ झाली नाही. मात्र त्यानंतर गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर व उपसभापती निलेश सुर्वे यांनी यशस्वी चर्चा केल्यानंतर गुहागर आगराच्या बसेस मार्गस्थ झाल्या.

अचानक एसटी सेवा ठप्प झाल्याने गुहागर-मुंबई मार्गासह विविध मार्गांवरील प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, व्यापारी तसेच अत्यावश्यक कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना आगारात बसची प्रतीक्षा करत ताटकळत राहावे लागले. चार तासांच्या या गोंधळामुळे एसटी प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. गुहागर आगारात चालक आणि वाहकांची संख्या आधीच मर्यादित आहे. नियमित फेऱ्या चालविताना ज्यादा ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच अनेकदा वाहतूक व्यवस्थेचा भार असतो. मात्र, हॉटेल किंवा ढाब्यावर बस थांबविल्याबद्दल चालक-वाहकांवर कारवाई करण्याचे आदेश निघाल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला.प्रत्येक चालक-वाहकाने आपली नियोजित आठ तासांची ड्युटी करायची आणि त्यापलीकडे ज्यादा ड्युटी करून प्रशासनाला सहकार्य करायचे नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे समोर आले. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळातच सर्व फेऱ्या चालविणे प्रशासनाला शक्य झाले नाही आणि एसटी वाहतुकीचे चाक अक्षरशः थांबले.
गुहागर-मुंबई मार्गावर तसेच मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीच्या बसेस अनेक ठिकाणी हॉटेल किंवा ढाब्यावर थांबत असतात. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना चहा, नाश्ता, जेवण तसेच नैसर्गिक विधींसाठी विश्रांतीची आवश्यकता असते. मात्र, या मार्गावर एसटीचा अधिकृत थांबा असलेली हॉटेल्स किंवा ढाबे नेमके कोणते, याबाबत स्पष्ट लेखी आदेश नसल्याचा मुद्दा चालक-वाहकांनी उपस्थित केला आहे. एका बाजूला प्रवाशांच्या सोयीसाठी बस थांबविणे आवश्यक असताना दुसऱ्या बाजूला अधिकृत थांबा नसलेल्या ठिकाणी बस थांबविल्यास चालक-वाहकांवर कारवाई केली जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.


एसटी सेवा ठप्प झाल्याची माहिती मिळताच गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती निलेश सुर्वे यांनी तातडीने गुहागर आगारात धाव घेतली. त्यांनी आगारातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी तसेच संबंधित कर्मचाऱ्यांशी चर्चा करून नेमका वाद काय आहे, याची माहिती घेतली. चर्चेदरम्यान एसटीच्या अधिकृत थांब्याबाहेर हॉटेल्स व ढाब्यांवर बस थांबविल्याबद्दल चालक-वाहकांवर होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला असहकाराची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले. यानंतर सभापती प्रणव पोळेकर यांनी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसेच परिवहन मंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चर्चा केली. यावेळी पंचायत समिती सदस्य संदिप गोरिवले, कोतळूक ग्रामपंचायत उपसरपंच, भाजपा तालुका सरचिटणीस सचिन ओक, रविंद्र कारकर, जावेद केळकर, सुदर्शन पाटील व सहकारी उपस्थित होते. सभापती, उपसभापती यांच्या पुढाकाराने गाडया सुटल्याने विद्यार्थी व प्रवाशी यांनी समाधान व्यक्त केले.
चालक-वाहकांवर करण्यात आलेल्या कारवायांबाबत तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांची भूमिका काही प्रमाणात मवाळ झाली. अखेर सुमारे चार तासांनंतर गुहागर आगारातून एसटी बसेस पुन्हा मार्गस्थ झाल्या आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, या चार तासांच्या ठप्प सेवेमुळे अनेक फेऱ्या रद्द झाल्याने त्याचा परिणाम पुढील वाहतूक वेळापत्रकावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गावर लांब पल्ल्याच्या एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना विश्रांती मिळावी, यासाठी बस कुठे थांबवायची, याचे स्पष्ट धोरण आवश्यक आहे. महामार्गावर अधिकृत एसटी थांबा असलेले हॉटेल किंवा ढाबे उपलब्ध नसताना चालक-वाहकांनी प्रवाशांच्या गरजेनुसार बस थांबवली तर त्यांच्यावर कारवाई होणार का? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ कारवाईचे आदेश देण्याऐवजी एसटी बसेससाठी अधिकृत विश्रांतीचे ठिकाण निश्चित करून त्याची यादी चालक-वाहकांना लेखी स्वरूपात देणे आवश्यक असल्याची मागणी पुढे येत आहे.


गुहागर आगारातील गुरुवारच्या प्रकारामुळे एसटी प्रशासन आणि कर्मचारी यांच्यातील समन्वयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज आश्वासन मिळाल्याने सेवा पूर्ववत झाली असली तरी ढाबे व हॉटेलवरील बस थांब्यांबाबत स्पष्ट लेखी आदेश निघाले नाहीत, तर भविष्यात पुन्हा अशाच प्रकारचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता एसटी प्रशासन अधिकृतपणे कोणत्या हॉटेल्स किंवा ढाब्यांवर बसेस थांबविण्यास परवानगी देते, प्रवाशांच्या सुविधेसाठी कोणती ठिकाणे निश्चित केली जातात आणि त्या ठिकाणी बस थांबविल्यास चालक-वाहकांवर कारवाई केली जाणार नाही याची हमी दिली जाते का, याकडे गुहागर तालुक्यासह एसटी प्रवाशांचे लक्ष लागले आहे.चार तासांच्या ठप्प सेवेनंतर एसटीची चाके पुन्हा फिरली असली तरी ढाबे-हॉटेलवरील थांब्यांचा हा प्रश्न अद्यापही ‘अनुत्तरित’च आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here