शिवसेनेच्या दोन्ही गटांना शृंगारतळीचा विसर? शाखा गायब, नागरिकांचा सवाल!

0
135
बातम्या शेअर करा

शृंगारतळी – मराठी माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यानंतर ‘गाव तिथे शाखा’ या संकल्पनेतून राज्यभर शिवसेनेच्या शाखांचे जाळे उभे राहिले. मात्र, गुहागर तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या शृंगारतळीत आजच्या घडीला शिवसेनेची अधिकृत शाखाच दिसत नसल्याने हा विषय परिसरात चर्चेचा ठरला आहे.
एकेकाळी शृंगारतळी बाजारपेठेतील शिवसेनेची शाखा ही सर्वसामान्य नागरिकांसाठी संपर्काचे महत्त्वाचे केंद्र मानली जात होती. गावातील एखाद्या नागरिकाला अडचण निर्माण झाली, शासकीय कार्यालयातील कामासाठी मार्गदर्शन हवे असेल किंवा एखाद्या प्रश्नासाठी पक्षाच्या माध्यमातून मदत अपेक्षित असेल, तर नागरिक जवळच्या शिवसेना शाखेशी संपर्क साधत असत. शाखेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील प्रश्न पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविले जात होते. मात्र, आता परिस्थिती बदलल्याचे चित्र शृंगारतळीत दिसत आहे. शृंगारतळी बाजारपेठेत किंवा गावाच्या परिसरात शिवसेनेची शाखा कुठे आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे….
शिवसेनेच्या स्थापनेनंतर शृंगारतळी बाजारपेठेत शिवसेनेची मुख्य शाखा कार्यरत होती. पुढील काळात राजकीय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची शाखाही शृंगारतळी बाजारपेठेत कार्यरत होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधण्यासाठी एक निश्चित ठिकाण उपलब्ध होते. मात्र, सध्या शृंगारतळी बाजारपेठेत शिवसेनेची शाखा नेमकी कुठे आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे राज्यात शिवसेनेचे दोन स्वतंत्र पक्ष कार्यरत असताना शृंगारतळीसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी दोन्ही गटांपैकी कोणाचीही ठळक शाखा दिसत नसल्याने स्थानिक राजकीय वर्तुळातही याची चर्चा सुरू आहे. शाखा ही केवळ पक्षाचे कार्यालय नसून अनेक वर्षांपासून सामान्य नागरिकांसाठी हक्काचे संपर्क केंद्र म्हणून तिची ओळख निर्माण झाली होती. स्थानिक समस्या, शासकीय कार्यालयातील अडचणी, रस्ते, पाणी, वीज, वाहतूक तसेच इतर सार्वजनिक प्रश्नांसाठी नागरिक शाखेकडे धाव घेत असत.
परंतु आता शाखाच दिसत नसल्याने “सर्वसामान्य नागरिकाला अडचण आली तर त्याने संपर्क साधायचा कुठे?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
शृंगारतळी ही गुहागर तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असून परिसरातील अनेक गावांसाठी ती प्रमुख संपर्काची जागा आहे. त्यामुळे येथे पक्षाची नियमित आणि नागरिकांना सहज उपलब्ध होणारी शाखा असणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
राज्यात सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना असे दोन स्वतंत्र राजकीय प्रवाह आहेत. दोन्ही पक्षांकडून संघटनात्मक विस्तार आणि स्थानिक पातळीवर पक्ष मजबूत करण्यावर भर दिला जात असताना शृंगारतळीत मात्र शाखेचा पत्ता नसणे हा विरोधाभास मानला जात आहे. शिवसेनेच्या शाखा या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी उपलब्ध राहाव्यात, अशी भूमिका शिवसेनेच्या स्थापनेपासून मांडली गेली. त्यामुळे शृंगारतळीतील शाखेचा प्रश्न संबंधित वरिष्ठ नेते आणि स्थानिक पदाधिकारी गांभीर्याने घेणार का? येथे पुन्हा नागरिकांसाठी शाखा सुरू होणार का? याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. शाखा कोणाची, कुठे आणि कधी सुरू होणार? याचे उत्तर आता शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या स्थानिक तसेच वरिष्ठ नेतृत्वाकडून अपेक्षित आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here