
चिपळूण – चिपळूण तालुक्यातील आंबडस-खांदाट सीमेवर शनिवारी दोन एस.टी. बसची भीषण धडक झाली असून, या दुर्घटनेत तब्बल २५ ते ३० प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची तीव्रता पाहता जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चिपळूणहून चोरवणेकडे जाणारी एस.टी. बस आणि कासईहून चिपळूणच्या दिशेने येणारी एस.टी. बस आंबडस-खांदाट हद्दीत एकमेकांवर आदळल्या. दोन्ही बसची धडक एवढी जोरदार होती की, बसमधील प्रवाशांमध्ये एकच आरडाओरड सुरू झाली. अचानक घडलेल्या या दुर्घटनेने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस तसेच एस.टी. विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. बसमध्ये अडकलेल्या व जखमी प्रवाशांना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी कामथे येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला, दोन्ही बसच्या चालकांकडून काही चूक झाली का किंवा रस्त्याच्या परिस्थितीचा काही संबंध आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू करण्यात येणार आहे.
या दुर्घटनेतील जखमींची अधिकृत संख्या, त्यांची प्रकृती आणि अपघाताचे नेमके कारण याबाबत प्रशासन व एस.टी. विभागाकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
आंबडस-खांदाट सीमेवरील या भीषण दुर्घटनेमुळे एस.टी. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
















