“बंधू… तुझं जाणं अजूनही मन मान्य करायला तयार नाही…”

0
165
बातम्या शेअर करा

सकाळी नऊची ती वेळ…मोबाईल वाजला… नेहमीसारखाच एक फोन असेल असं वाटलं…पण त्या एका फोनने आयुष्यभराची पोकळी देऊन टाकली… समोरून शब्द आले — “बंधू (प्रतीक आयरे ) आपल्याला सोडून गेला…” क्षणभर शरीर जागेवर होतं… पण मन कोसळलं होतं…काहीच सुचत नव्हतं…डोळे उघडे होते, पण विश्वास बसत नव्हता…मन सतत एकच सांगत होतं —“नाही… हे खोटं असेल…”

माझ्या आणि त्याच्या वयात दहा-बारा वर्षांचं अंतर होतं…
पण त्याने कधी मला मोठं आणि स्वतःला लहान मानलं नाही…
तो फक्त भाऊ नव्हता…तो जिव्हाळा होता…सवय होती…आयुष्याचा एक भाग होता…तो मराठी शाळेत होता, मी हायस्कूलमध्ये… तेव्हापासून आमची साथ सुरू झाली… एकत्र खेळलो…एकत्र बसलो…एकत्र जेवलो…खूप चेष्टा-मस्करी केली…
पण त्या प्रत्येक नात्यात संस्कारांची एक सुंदर मर्यादा कायम होती…. बंधू म्हणजे शांत स्वभावाचं जिवंत उदाहरण…कोणी काहीही बोललं तरी उलट उत्तर नाही…राग नाही… मोठेपणा नाही…फक्त चेहऱ्यावर कायम हसू… आणि मनात सगळ्यांसाठी प्रेम…म्हणूनच त्याने माणसं जोडली…आणि तीही मनापासून…आज आम्ही शेजारी शेजारी राहत नसलो तरी…पण कुठेही भेटला की तो थांबायचाच…“कसा आहेस?” म्हणत दोन मिनिटं नाही तर अर्धा तास बोलायचा…मीही गिमवीला गेलो की त्याच्या घरी गेल्याशिवाय परत फिरायचो नाही…

त्या दुर्दैवी घटनेच्या आदल्या रात्रीची ती आठवण आजही मनाला चटका लावून जाते…रात्री साधारण आठच्या सुमारास मी बंधूंला भेटण्यासाठी गिमवीत निघालो होतो. त्यावेळी वाटेत गिमवी फाटा येथे विकास शितप याचे घर लागत त्याला सोबत घेऊन मी पुढे जाईन असे ठरवून मी विकासच्या घरी गेले मात्र काही कामानिमित्त विकास घरी नसल्याने मी पुढे गिमवीला जाणे टाळले…
त्या क्षणी तो फक्त एक साधा निर्णय वाटला होता… पण नियतीने मात्र काही वेगळंच ठरवून ठेवलं होतं…आज मनात सतत एकच विचार येतो —“त्या रात्री जर मी पुढे गेलो असतो, तर कदाचित बंधूंची शेवटची भेट झाली असती…” ती भेट न होणं… हे दुःख मनात कायमच घर करून राहिलं आहे…

त्याचं लग्न झालं… संसार वाढला… जबाबदाऱ्या वाढल्या…पण मित्रांसाठी त्याच्या मनातली जागा कधी कमी झाली नाही…
चार बहिणींचा तो लाडका भाऊ…घरच्यांचा जीव…मित्रांचा आधार…
आणि गावासाठी एक प्रेमळ माणूस… आजही हे लिहिताना हात थरथरतात… कारण मन अजूनही स्वीकारायला तयार नाही की “बंधू” आता आपल्यात नाही…

त्या दिवशी त्याच्या घरासमोर जमलेली गर्दी पाहून डोळे भरून आले…तो ना नेता होता…ना कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता…ना मोठा उद्योगपती…तो फक्त एक चांगला माणूस होता…आणि आयुष्यात शेवटी माणूस म्हणून कमावलेली हीच खरी श्रीमंती असते…
त्याच्या अंत्यदर्शनासाठी हजारो लोक आले होते…गिमवी गावाने कदाचित पहिल्यांदाच एवढी गर्दी एखाद्या अंत्ययात्रेला पाहिली असेल…त्याच्या दुःखद निधनाची ना सोशल मीडियावर पोस्ट…ना वर्तमानपत्रात बातमी…तरी लोक स्वतःहून धावत आले…कारण त्याने नाती कमावली होती…मनं जिंकली होती…

आणि सर्वात वेदनादायक क्षण म्हणजे…शेवटचं त्याचं दर्शन…
डोळे मिटलेले होते…पण चेहऱ्यावर तेच निरागस हसू होतं…
असं वाटत होतं की तो आत्ताच डोळे उघडेल…आणि नेहमीसारखा हसत म्हणेल —“अरे… मी कुठे जाणार होतो…?” पण यावेळी तो खरंच निघून गेला होता… कायमचा… त्याच्या जाण्याने आयुष्यातली एक जागा कायमची रिकामी झाली आहे…एक छोटा भाऊ…एक जिवलग मित्र…आणि मनाने श्रीमंत असलेला माणूस हरपला आहे…. बंधू…तू आज दिसत नाहीस…
पण प्रत्येक आठवणीत जिवंत आहेस…प्रत्येक हसण्यात… प्रत्येक वेदनेत… प्रत्येक आठवणीत…आणि हो… तुझ्या कुटुंबासोबत आम्ही कायम उभे आहोत…कारण तू फक्त त्यांचा नव्हतास…
तू आमचाही होतास… 🙏

लक्ष्मीकांत घोणसेपाटील / पिंट्या पाटील …..🅿️🅿️✍🏻


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here