चिपळूण – मुंबई-गोवा महामार्गावरील कापसाळ येथे कार व स्कूल बसला समोरासमोर भीषण अपघात घडला. या अपघातात स्कूल बसमधील १४ विद्यार्थी बालंबाल बचावले.
सध्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यासाठी काही ठिकाणी रस्ता ठेवून काम केली जात आहेत. मात्र त्याबाबचे दिशादर्शक फलक उभारण्यात न आल्याने व काहीजण चुकीच्या दिशेने वाहने चालवत असल्याने वारंवार अपघात घडत आहेत. हाही अपघात यातूनच झाला.
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा कार चालक संदीप सावंत हा रत्नागिरीहून खेडच्या दिशेने निघाला होता. कामथे येथे येताच स्कूलची बस अचानक विरुद्ध दिशेने आल्याने समोरासमोर धडक झाली. यात कार जागीच पलटी झाली. हा अपघात झाला असे कळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदत केली. यावेळी स्कूल बसमधील १४ विद्यार्थ्यांना गाडी बाहेर काढण्यात आले. व ते सर्वजण सुखरूप होते. कारमधील बँकेचे काही अधिकारी किरकोळ जखमी झाले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा चिपळूण पोलिसांमार्फत सुरु आहे.