“शृंगारतळीची प्रगती की अस्वच्छतेची किंमत? महिलांना स्वच्छतागृह नाही, विहिरींमध्ये सांडपाणी!” – प्रमोद गांधी आक्रमक

0
50
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेतील मूलभूत सुविधांचा प्रश्न आता जिल्हा परिषद सभेत ऐरणीवर आला आहे. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाचा अभाव आणि इमारती-व्यापारी संकुलांमधून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे विहिरींचे प्रदूषण, या दोन्ही गंभीर प्रश्नांवर जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रमोद गांधी यांनी शृंगारतळी बाजारपेठेतील महिला स्वच्छतागृहाचा प्रश्न ठामपणे मांडला. शृंगारतळी ही परिसरातील मोठी बाजारपेठ असून आजूबाजूच्या सुमारे २० ते २५ गावांतील नागरिक विविध कामांसाठी आणि खरेदीसाठी येथे येतात. दररोज मोठ्या संख्येने महिला व नागरिक बाजारपेठेत दाखल होतात. मात्र महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे, पूर्वी या ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था होती; मात्र कालांतराने ते बंद पडले. ग्रामीण भागातून एसटी बसने येणाऱ्या महिलांना बसची प्रतीक्षा करताना स्वच्छतागृहाअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शृंगारतळी बाजारपेठेत महिलांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज स्वच्छतागृह तातडीने उभारण्यात यावे, अशी मागणी गांधी यांनी केली.
दरम्यान, शृंगारतळीतील वाढत्या बांधकामांमुळे निर्माण झालेला सांडपाण्याचा प्रश्न अधिक गंभीर असल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. बाजारपेठ परिसरात अनेक मोठ्या इमारती, दुकाने आणि व्यापारी संकुले उभी राहिली आहेत. या इमारतींमधून निर्माण होणारे सांडपाणी गटारांद्वारे नदी-नाल्यांमध्ये सोडले जात असल्याने त्याचा थेट परिणाम परिसरातील जलस्रोतांवर होत असल्याचा आरोप करण्यात आला. सांडपाण्यामुळे शृंगारतळी आणि आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या विहिरींचे पाणी प्रदूषित होत असल्याचा मुद्दा गांधी यांनी उपस्थित केला. हेच पाणी नागरिकांच्या वापरात येत असल्याने भविष्यात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
वाढत्या व्यापारीकरणासोबत सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारीही निश्चित झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. व्यापारी संकुले आणि मोठ्या इमारतींना सांडपाणी व्यवस्थापनाबाबत स्पष्ट नियम लागू करावेत तसेच इमारतींच्या सांडपाण्याची स्वतंत्र व्यवस्था संबंधित बांधकामधारकांनीच करावी, असे निर्देश देण्याची मागणी त्यांनी केली.शृंगारतळीच्या बाजारपेठेला वाढत्या लोकसंख्येसोबत सुविधा देणे आवश्यक असताना स्वच्छतागृह आणि सांडपाणी व्यवस्थापनासारखे मूलभूत प्रश्न प्रलंबित राहणे गंभीर बाब आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी केवळ कागदी कार्यवाही न करता प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रमोद गांधी यांनी केली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here