गुहागर – गुहागर एसटी आगारातील अजब नियोजनामुळे प्रवासी व स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नवीन एसटी गाड्या उपलब्ध नसतानाही गुहागर आगारातून नवीन फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गुहागर आगारात आधीच एसटी गाड्यांची कमतरता असून चालक व वाहकांची संख्याही अपुरी असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत उन्हाळी सुट्टीसाठी अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करण्यात आल्याने विद्यमान सेवांवर ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, काही मार्गांवरील नियमित सेवा विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या नियोजनामागील उद्देश काय, तसेच यासाठी जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारी कोण,? याबाबत स्पष्टता नसल्याने स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी वर्गात संभ्रमाचे वातावरण आहे. प्रवाशांच्या सोयीपेक्षा अडचणी वाढवणारे असे निर्णय का घेतले जात आहेत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रत्नागिरी येथील एसटीचे वरिष्ठ अधिकारी हे एसटी महामंडळाला फायद्यात आणण्याच्या दृष्टीने हे नियोजन करण्यात आले असले तरी यामुळे उलट तोटा होण्याची शक्यता आहे, याबाबतही चर्चा रंगत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गुहागर आगाराच्या या अजब कारभाराबाबत येथील काही ग्रामस्थांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे लेखी तक्रार केल्याच्या सुद्धा समजत आहे. तसेच गुहागर येथील काही एसटीचे अधिकारी हे जागेवर बसून हे तोट्याचा नियोजन करत असल्याने त्यांची सुद्धा चौकशी करावी अशी मागणी चालक वाहकांमधून केली जात आहे.
















