चिपळूण – महापूर आला असताना चिपळूण आगार व्यस्थापकानी एसटीच्या तिकिटाची आठ लाखाची रोकड उराशी बाळगून जीवाची पर्वा न करता सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण केले. कर्मचाऱ्यांच्या या साहसाचा आम्हाला अभिमान आहे. एसटीचे हित जपणारे असे कर्मचारी असतील तर आज एसटी ज्या परिस्थितीतून जातेय त्या परिस्थितीतून लवकरच बाहेर पडेल, असा विश्वास परिवहनमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी व्यक्त केला. महापूरात नऊ तास एसटीच्या टपावर बसून आठ लाखाची रोकड वाचविणाऱ्या चिपळूण आगारव्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांचा आज चिपळूण येथे पालकमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार विनायक राऊत, आ. भास्कर जाधव, आ. राजन साळवी, आ. शेखर निकम, आ. योगेश कदम, जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, विभाग नियंत्रक भोकरे उपस्थित होते. आगारव्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांच्यासह अन्य कर्मचारी आणि मदतकार्य करणाऱ्या पोलिसांचा सत्कार करण्यात आला.