रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हयातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी विविध प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत असल्याने तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कोव्हीड -१९ रुग्णांच्या पॉझिटीव्हीटीचे प्रमाण २० टक्के असून ६७ टक्केच्यावरती ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्याप्त आहेत त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी जिल्ह्यातील सदयपरीस्थिती विचारात घेता रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत कडक निर्बंध लागू करणे आवश्यक आहे, अशी माझी खात्री झाली आहे, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले.
दि. २ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते दि. ८ जून २०२१ रोजीचे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निबंध लागू करण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत. मेडीकल दुकाने , आरोग्य विषयक सेवा , व आरोग्य विषयक आस्थापना पुर्णवेळ सुरु राहतील. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे दुकान, आस्थापना पुर्णत: बंद राहतील . दुध व किराणा मालाची दुकाने यांना केवळ घरपोच सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत पुरविता येईल .
रत्नागिरी जिल्ह्याच्या सिमा अन्य जिल्ह्यातून प्रवेश करणेस किंवा अन्य जिल्हयात प्रवास करणेस बंद करणेत येत आहेत . तथापि , केवळ नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी , वैदयकिय उपचारासाठी, व कोव्हीड -१९ व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक सेवा किंवा निकडीच्या, आणिबाणीच्या प्रसंगी रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणेस किंवा रत्नागिरी जिल्ह्यातून अन्य जिल्ल्यात प्रवास करणेस मुभा राहील. जिल्हयात प्रवेश करणान्या कोणत्याही व्यक्तीस ४८ तास अगोदर केलेली कोव्हीड -१९ निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र सोबत असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही . मालवाहतुकीसाठी कोणतेही बंधन असणार नाही. तथापि , अशी मालवाहतुक केवळ दुकानापर्यंत, आस्थापनेपर्यंत माल वितरण करणेपुरती मर्यादित राहील . कोणत्याही ग्राहकास थेट माल पुरविता येणार नाही . याबाबत शर्तभंग आढळल्यास अशा मालवाहतुकदाराची सेवा कोव्हीड -१९चा प्रादुर्भाव आटोक्यात येईपर्यंत बंद करणेत येईल. शेतीच्या पेरणीचा हंगाम विचारात घेता कृषिविषयक संलग्न सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या काळात सुरु ठेवणेस मुभा राहील. सदरचा आदेश संपुर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या क्षेत्रासाठी (प्रतिबंधीत क्षेत्र वगळून) लागू राहील , सदरच्या आदेशाची अंमलबजावणी दि. २ जून २०२१ रोजीचे सकाळी ७ वाजलेपासून ते दि. ८ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत अंमलात राहील.