गुहागर – रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती मार्फत राबविल्या जाणाऱ्या जिल्हा वार्षिक योजना सन २०२४/२५ या आर्थिक वर्षात ग्रामीण रस्ते विकास या कार्यक्रमाकरीता मंजूर करण्यात आलेल्या निधीमध्ये सुद्धा फार मोठी तफावत असल्याचे माजी आमदार विनय नातू यांनी सांगितले. त्यामुळे या निधीवरून पुन्हा महायुतीत तणाव असल्याचे स्पष्ट होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दोन मतदारसंघात १५ कोटी रुपये खर्च आणि तीन मतदारसंघात ८ कोटी रुपये खर्च इतकी मोठी तफावत जिल्हा नियोजनमध्ये राहीली तर या सर्वांचा परिणाम ग्रामीण भागातील विकास कामांवर होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील विकास होत नाही.या पध्दतीने कंत्राटदारांच्या भल्यासाठी निर्णय घेतले जातात आणि कृषी विभागातील निधी कमी केला जातो. ॔जलकुंड ॓ या योजनेचा निधी कमी करण्यात आला आहे. अशा पध्दतीने जिल्हा नियोजनाचे कामकाज सुरू राहीले तर ते रत्नागिरी जिल्ह्याच्या एकूणच विकासासाठी हानीकारक असल्याचे विनय नातू यांनी स्पष्ट केले. नातू यांच्या या टीकेमुळे महायुतीत पुन्हा एकदा संघर्ष पहावयास मिळणार आहे.