सेवादूत प्रणाली द्वारे घरबसल्या मिळणार दाखले.. तहसीलदार परिक्षित पाटील

0
1
बातम्या शेअर करा


गुहागर – गुहागर नगरपंचायत, असगोली व पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमध्ये आदिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला यांच्यासह इतर दहा दाखले घरबसल्या मिळणार आहेत. शासनाचा सेवादूत उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर गुहागर तालुक्यात सुरू करण्यात आला आहे. नागरिक व ग्रामस्थांनी सेवादूतच्या लिंकवर जावून दाखल्याची मागणी भरल्यावर सेवाकेंद्राचे कर्मचारी थेट संबंधित घरी जावून पुढील कार्यवाही करणार आहेत. अशी माहिती गुहागरचे तहसिलदार परिक्षित पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र शासनातर्फे प्रणाली उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामस्थांना वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, तात्पुरते रहिवास प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र,शेतकरी, दाखला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र, डोंगरी दाखला, ३० टक्के महिला आरक्षण हे दाखले घरबसल्या मिळणार आहेत. ही योजना वर्धा, पुणे,अहिल्यादेवीनगर, आणि रत्नागिरी या जिल्ह्यात सुरु होत आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी प्रायोगिक तत्त्वावर सेवादूत प्रणाली गुहागर तालुक्यात राबविण्याचे ठरविले. त्यानुसार गुहागर तालुक्यातील गुहागर नगरपंचायत तसेच पाटपन्हाळे व असगोली या दोन ग्रामपंचायती निश्चित करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी सेवादूत प्रणाली वापरताना येणाऱ्या अडचणीं लक्षात घेवून जिल्हा माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत संशोधन आणि विकास (आर अॅण्ड डी) कार्यक्रमांतर्गत बदल करण्यात येतील. ही प्रणाली सुरळीत सुरु झाली की जिल्ह्यातील आणखी काही ठिकाणी ही सेवा सुरू होईल.आपले सरकार सेवा केंद्र चालक, सेतू केंद्रचालक,महसुल विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभाग या सर्वांचे सामुहिक काम यशस्वी झाले की, संपूर्ण जिल्ह्यात सेवादूत प्रणालीचा विस्तार करण्यात येणार आहे.

सेवादूत प्रणालीमध्ये सुरवातीला शासनामार्फत गुहागर, असगोली, पाटपन्हाळेतील ग्रामस्थांना सेवादूत रत्नागिरीची लिंक देण्यात येणार आहे. या (https://sevadootratnagiri.in/) लिंकद्वारे आपण सेवादूत प्रणालीमध्ये पोचु. त्यानंतर ग्रामस्थांनी आपले नांव, मोबाईल नंबर, संपूर्ण पत्ता, आपल्याला कोणता दाखला हवा आहे याची माहिती भरायची आहे. ही माहिती भरल्यानंतर संबंधित दाखल्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची माहिती मोबाईलवर आपल्याला दिसेल. ती कागदपत्रे आपल्याकडे आहेत का याची खातरजमा करुन आपण आपल्या जवळचे आपले सरकार केंद्र किंवा सेतू केंद्र निवडायचे आहे. तसेच केंद्र चालकाला आपण घरी कधी भेटणार याची तारीख व वेळ द्यायची आहे. एवढी माहिती भरल्यावर आपला अर्ज दाखल करायचा. अर्ज दाखल केल्यावर आपल्याला टोकन नंबर येतो तो लिहून ठेवायचा. ही माहिती भरल्यावर कागदपत्रांची माहिती घेण्यासाठी व गृहभेटीची निश्चिती करण्यासाठी केंद्रचालक आपल्याला संपर्क करतील. सर्व कागदपत्रांची पूर्तता असेल शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत आपले दाखले पुन्हा घरपोच होतील.
आपण पाठवलेल्या अर्जानंतर आपले कागदपत्र अपूर्ण असले तर आपल्या गृहभेटीची तारीख आणि वेळ यांची नव्याने निश्चित (रिशेड्युल) करता येऊ शकते. आपण चुकीचा अर्ज भरला असल्यास त्याची कल्पना आपल्याला देवून तो अर्ज रद्द करण्याचा अधिकारही केंद्र चालकांना देण्यात आला आहे. मात्र अशावेळी योग्य कारण केंद्र चालकाला लिहावे लागणार आहे. सेवादूत प्रणाली सध्या नवी असल्याने प्रत्यक्ष वापराच्या वेळी काही अडचणी येऊ शकतात. अशा अडचणींची माहिती देण्यासाठी त्याच वेबलिंकवर अभिप्राय देण्याची सुविधाही देण्यात आली आहे. या सुविधेद्वारे नागरिकांनी आपल्या अडचणी शासनापर्यंत पोचवाव्यात. असे आवाहन यावेळी तहसिलदार परिक्षित पाटील यांनी केले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here